मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण शिगेला पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते राहूल गांधींनी पत्रकार परिषद घेतली होती. या दरम्यान, त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. राहूल गांधींनी असा दावा केला की, 'निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेत अनेक बोगस मतदारांनी मतदान केले आहे'. यासह, त्यांनी पुरावेही सादर केले. राहूल गांधींनी केलेल्या आरोपांनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक खळबळजनक दावा केला. यावर, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रविवारी सकाळी ट्विट करत शरद पवार आणि राहुल गांधींना सुनावले.
केशव उपाध्ये काय म्हणाले?
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, 'सोंग आणिक झोंग, येरझार भोंग, भजन नाही ठाव, तोंड केले गोंगाट। राहूल गांधी आणि आता शरद पवार यांचं मतदारयादीवरून जे सध्या सुरू आहे, त्याचं वर्णन करायचं तर तुकाराम महाराजांचा हाच अभंग योग्य. कधी ईव्हीएम वर शंका तर कधी मतदार यादीवर शंका पण मुळात जनसेवेच, विश्वासार्हतेचे व्रतच यांना माहिती नाही. जनता का नाकारते तेच लक्षात न घेता आरोप सुरू आहेत. ईव्हीएमहॅकचा आरोप खोटा ठरला तर आता मतदार यादीवर शंका. ही मंडळी अत्यंत मुलभूत प्रश्नांची उत्तर देत नाहीत..
1 मतदार यादी ही उमेदवाराकडे असते तरी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही
2 मतदार यादी मोठी असते लक्षात नाही आलं पण मग तुमच्या पक्षाचा पोलिंग एजन्ट काय करीत होता? की पक्षाच्या पोलिग एजन्ट वर विश्वास नाही
3 शरद पवारांना ज्या वेळी अशी निवडणूक मॅनेज करून देतो म्हणणारी मंडळी भेटली त्याच वेळी त्यांनी ते जाहिर का नाही केल? कारवाई का नाही केली.
4 आता ती माणसेच आठवत नाही म्हणणे म्हणजे ढोंगीपणाचा कळस आहे
5 बर मतदार यादी शुध्दीकरण बिहार मध्ये सुरू तर त्याला विरोध का?
गल्ला जमवणारे चित्रपट देणाऱ्या सलीम जावेदचा आदर्श कितीही राहूल शरद या जोडीने घेतला तरी ये स्र्कीप्ट रायटिंग चलेगा नही. कारण, तुका म्हणे नाथा, शोधी अंतरी, उगाचि बाह्याभास, नाही तुज मिरी।।'.
काय म्हणाले शरद पवार?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक खळबळजनक दावा केला. ते म्हणाले की, 'जेव्हा विधानसभा निवडणुक जाहीर झाली, तेव्हा दिल्लीमध्ये मला दोनजण भेटायला आले होते. ते कुठे राहतात आणि त्यांची नावे मला माहित नाही. आम्ही तुम्हाला 288 पैकी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. पण तेव्हा माझ्या मनात निवडणूक आयोगाविषयी कोणत्याही प्रकारची शंका नव्हती. त्यामुळे, मला असे लोक भेटत असतात, म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर, मी त्या लोकांना राहूल गांधी यांच्यासोबत भेट घालून दिली. त्या दोघांनी त्यांचे म्हणणे राहुल गांधी यांच्यासमोर मांडले. तसेच, आमचा लोकाहीवर विश्वास असल्याने मी आणि राहूल गांधींनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही जनतेच्या दरबारात जाऊन मते मागण्याची भूमिका पसंत केली. मात्र, गुरूवारी राहुल गांधींनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी अतिशय कष्ट करून आणि अभ्यास करून मतचोरीची मांडणी केली'.