Monday, September 08, 2025 03:11:55 PM

Manoj Jarange On GR : ...अन्यथा दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेणार, डिस्चार्ज मिळताच जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी म्हणून आरक्षण देण्याच्या मागणीवर परत एकदा मनोज जरांगे यांनी भाष्य केले आहे.

manoj jarange on gr  अन्यथा दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेणार डिस्चार्ज मिळताच जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

छत्रपती संभाजीनगर: सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी म्हणून आरक्षण देण्याच्या मागणीवर परत एकदा मनोज जरांगे यांनी भाष्य केले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पुन्हा एकदा सरकारविरोधात बोलायला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी सरकारला डेडलाइन दिली आहे. 

'जीआर काढला आता अंमलबजावणी करा'
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईतील आंदोलनात राज्य सरकारने तीन गॅझेटच्या नोंदीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला होकार दिला होता. मुंबईतील आंदोलनानंतर मनोज जरांगे रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु आता पुन्हा एकदा ते आंदोलनासाठी उभे राहिले आहेत. मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी 17 सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. सरकारने जीआर काढला आहे, आता त्याची अंमलबजावणी करा असेही त्यांनी सरकारला सांगितले आहे. 

हेही वाचा: Uday Samant VS Vijay Wadettiwar : 'ओबीसी समाजाचं काहीही कमी होणार नाही'; मंत्री उदय सामंतांचं वड्डेटीवारांना प्रत्युत्तर

मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे अशी मागणी करत सरकारला डेडलाइन दिली आहे. जीआर काढला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करा. नोंदी सापडल्या आहेत, त्यांना लवकर कुणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजेत. यात बदल करु नये नाहीतर मला नाईलाजास्तव मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. 17 सप्टेंबरपर्यंत नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास सुरुवाती झाली नाही, तर मला दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घ्यावा लागेल असे जरांगेंनी म्हटले आहे. बीडमधील नारायणगडावर मराठा समाजाकडून दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यातील निर्णायक टप्प्यानंतर हा दसरा मेळावा होत असल्याने सगळ्यांचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे.

मनोज जरांगे यांनी 100 टक्के मराठ्यांना प्रमाणपत्र मिळणार याची मला गॅरंटी आहे असे म्हटले आहे. तसेच आपला विजय खूप लोकांना पचत नाही. काही लोक आता प्रश्न उपस्थित करत आहेत. शब्द चुकला, काही झाले तर ते दुरुस्त करण्याचे काम सरकारचे आहे आमचे नाही असेही जरांगे यांनी सांगितले आहे.

'सरसकट मराठा ओबीसीत जाणार'

नोंदी नसलेल्या मराठा बांधवांना गॅझेटनुसार प्रमामपत्र द्यावे लागेल आणि ते द्यायला सुरुवात करा अशी मागणी जरांगेंनी केली. सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिले जाणार नाही अशी चर्चा आहे. मात्र कुणी काहीही म्हणत असले तरी या नोंदीनुसार मराठवाड्यातील सगळा मराठा समाज ओबीसीत जाणार असल्याचा दावा मनोज जरांगे पाटलांनी केला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री