डेहराडून : अडीच वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर, न्यायालयाने अखेर उत्तराखंडच्या अंकिता भंडारी हत्या प्रकरणात निकाल दिला. न्यायालयाने या प्रकरणातील तीन आरोपी पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित उर्फ पुलकित गुप्ता यांना दोषी ठरवले आणि त्यांना दंडही ठोठावला.
19 वर्षीय अंकिता भंडारीचा सप्टेंबर 2022 मध्ये संशयास्पद स्थितीमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयात कोणते युक्तिवाद मांडले, हे खूप महत्त्वाचे आहे. कारण केवळ यामुळेच आरोपींना दोषी ठरवता आले.
उत्तराखंड येथील पौरी न्यायालायाने शुक्रवारी 2020 साली घडलेल्या अंकिता भंडारी हत्या प्रकारणा तीन जणांना दोषी ठरवले. तसेच, या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रीना नेगी यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या हत्याकांडाने त्यावेळी संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. पण नेमकं हे प्रकरण काय होतं याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. या आरोपींमध्ये भाजपच्या माजी मंत्र्याच्या मुलाचाही समावेश आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजपने आरोपी मुलगा पुलकित आर्य याचे वडील आणि पक्षाचे नेते विनोद आर्य यांना पक्षातून काढून टाकले होते.
बचाव पक्षाने म्हटले, 'अंकिताने आत्महत्या केली'
फिर्यादी पक्षाने म्हटले की, अंकिता रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असताना तिचा खून करण्यात आला होता, तर बचाव पक्षाने सातत्याने असे म्हटले की अंकिताचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात असाही दावा केला की, अंकिता तिचे घर सोडून तिच्या मित्राशी लग्न करू इच्छित असल्याने ती अस्वस्थ होती. अंकिताचा मृतदेह ऋषिकेशमधील चिला कालव्यातून सापडला. ती पुलकित आर्यच्या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती.
हेही वाचा - हनीमूनसाठी शिलाँगला गेलेलं इंदूरचं जोडपं बेपत्ता; रेंटवर घेतलेली अॅक्टिव्हा आढळली, 11 मे रोजी झालं होतं लग्न
अंकिताचा छळ केला जात होता
या प्रकरणात अभियोजन पक्षाने न्यायालयात पुरावा म्हणून व्हॉट्सअॅप चॅट्स (WhatsApp Chat)सादर केले. फिर्यादी पक्षाने असा दावा केला की, अंकिता रिसॉर्टमध्ये आली तेव्हापासून ती बेपत्ता होईपर्यंतच्या सर्व चॅट्सवरून ती अत्यंत अस्वस्थ असल्याचे दिसून येते. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, अंकिता आरोपीच्या वागण्याने आणि अतिरिक्त सेवेसाठी देण्यात येणाऱ्या "अश्लील प्रस्तावांमुळे" नाराज होती.
फिर्यादी पक्षाने न्यायालयाला सांगितले की एका चॅटमध्ये अंकिता भंडारीने लिहिले होते की, "मी गरीब आहे; पण म्हणून काय मी स्वतःला 10 हजार रुपयांना विकू का?" अंकिताच्या हत्येप्रकरणी वैद्यकीय पथकाने म्हटले होते की, ती कोणत्याही अपघातामुळे कालव्यात पडली नाही तर तिला ढकलण्यात आले होते. सरकारी वकिलांनी सांगितले की, 18 सप्टेंबर 2022 च्या संध्याकाळी या प्रकरणातील साक्षीदारांनी अंकिता फोनवर रडताना पाहिली. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, अंकिता तिला येथून घेऊन जा असे म्हणत होती. तिने रिसॉर्ट कर्मचाऱ्यांना तिची बॅग रस्त्यावर आणण्यास सांगितले होते. अंकिता पुलकितसोबत स्कूटरवर होती. साक्षीदारांनी असेही सांगितले की, त्यांनी अंकिता आरोपीसोबत मोटारसायकलवरून रिसॉर्टमधून बाहेर पडताना पाहिले. सरकारी वकिलांनी सांगितले की, अंकिताच्या शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंकिता पशुलोकमधील बॅरेजवरून स्कूटरवर पुलकित आर्यच्या मागे बसलेली दिसत होती तर इतर दोन आरोपी, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता हे त्यांच्या मागे मोटारसायकलवर बसलेले होते. या परिस्थितीजन्य पुराव्यावरून अंकिताच्या मारेकऱ्यांना दोषी ठरवण्यात आले.
नेमकं प्रकरण काय आहे?
18 सप्टेंबर 2022 च्या रात्री ऋषिकेश येथील वनतारा रिसॉर्टमध्ये अंकिता भंडारी नावाच्या 19 वर्षीय रिसेप्शनिस्टची तीन जणांनी हत्या केली. ज्यामध्ये भाजपाचे माजी नेते विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य ज्याने तिला नोकरीवर ठेवले होते याचा देखील समावेश होता. पोलिसांनी सांगितले की, पुलकित याने रिसॉर्टमधील काही ग्राहकांना ‘स्पेशल सर्व्हिस’ देण्यास नकार दिल्याने अंकिताची हत्या केली. दरम्यान या तिघांनी हत्येची कबुली दिल्याच्या दुसर्या दिवशी २४ सप्टेंबर रोजी अंकिताचा मृतदेह हा चिल्ला कॅनलमध्ये आढळून आला होता.
पुलकित आर्या याला आयपीसी कलम 302 (हत्या), 201, 354 अ आणि अवैध तस्करी कायदा याअंतर्गत शुक्रवारी दोषी ठरवण्यात आले आहे. दुसरा आरोपी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता हे देखील हत्या, पुरावे लपवणे आणि अवैध तस्करी अशा गुन्ह्यात दोषी आढळले आहेत.
हेही वाचा - ऑनलाईन गेमच्या व्यसनाचा बळी! जुगारासारख्या खेळांमुळे कर्जबाजारी होऊन तरुणाची आत्महत्या
अंकिता भंडारी कोण होती?
अंकिता भंडारी ही पौरी येथील एका अत्यंत गरीब कुटुंबातील होती, ती शिक्षणसाठी शहरात आली होती. तिचे वडील बिरेंद्र भंडारी हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. तिने हॉटेल मॅनेजमेंट शिक्षणासाठी एका संस्थेत प्रवेश घेतला होता, पण करोना काळात पैशांची अडचण असल्याने तिने शिक्षण अर्ध्यात सोडले होते.
अंकिताचा मित्र पुष्प याने ऋषिकेश येथील रिसॉर्टमध्ये नोकरी असल्याचे सांगितले( पुढे हा मित्र प्रकरणात साक्षीदार बनला). अंकिताने ही नोकरी करण्याचा निर्णय घेतला. नोकरीच्या पहिल्या महिन्यातच तिने पुष्प याला सांगितले की, आरोपी तिला 10 हजार रुपयांच्या बदल्यात व्हिआयपी लोकांना ‘विशेष सेवा’ देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत आहेत.
पुष्प याने न्यायालयाला सांगितले की, रात्री 8.32 वाजता पीडिता त्याच्याशी अखेरची बोलली होती आणि आरोपी तिच्याबरोबर असून तिला भीती वाटत असल्याचेही तिने सांगितले होते.