मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांनी ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. बुधवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्योगमहर्षी रतन टाटा यांचे पार्थिव गुरुवारी १० ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी अनंतात विलीन झाले. पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या रतन टाटांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अलोट जनसागर लोटला होता. राजकारण, उद्योग आणि मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गजांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त कळताच गुरुवारी दिवसभरासाठी महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये एक दिवसाचा शोक जाहीर करण्यात आला होता.