मुंबई: महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले, न सुटणारा प्रश्न आम्ही सोडवला अशी टिमकी सरकारने मारली असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षण न सुटणारा प्रश्न आम्ही सोडवला, अशी टिमकी सरकारने मारली. त्यातून सगळ्यांना फसवलं गेलं, कुणाच्या हाताला काहीच लागलं नाही. सरकारने जो जीआर (GR) काढला, त्यातून सर्व राजकीय पक्षांना भाजपने गंडवलं अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरद्वारे सरकारने जरांगे, ओबीसी या सर्वांचीच फसवणूक केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
Devendra Fadanvis: 'हा सरसकट जीआर नाही...', भुजबळांच्या नाराजीवर काय म्हणाले फडणवीस?
प्रकाश आंबेडकर म्हणाले, कुणबी ही जात नाही, हा व्यवसाय आहे. सगळे मराठा हे कुणबी मानता येत नाहीत. विखे पाटील आणि उपसमितीने सगळ्यांना फसवलं आहे. जो आनंद मराठा समाज व्यक्त करतोय, तो क्षणिक असल्याचेही आंबेडकरांनी म्हटले आहे.
दरम्यान मराठा समाजाला आरक्षण दिल्याने ओबीसींमध्ये नाराजीचे चित्र आहे. तसेच छगन भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिले. यामुळे मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावरुन मंत्री छगन भुजबळ नाराज दिसले. याच मुद्द्यावर बोलताना भुजबळ यांनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. सातारा आणि औंध दोन्ही गॅझेट 20 सालचे आहेत. नोंदी नाहीत, प्रमाणपत्र अवैध यावर हा प्रश्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.