मुंबई: राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे. मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलन छेडले आणि सरकारकडून काही मागण्या मान्य करून घेतल्या. मात्र, त्यानंतर ओबीसी समाज सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात उभा ठाकला आहे. त्याचवेळी बंजारा समाजातही आरक्षणावरून आक्रमक झालेला दिसत आहे. राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा: Amit Satam On BMC : मुंबईतील मोकळ्या जागा महापालिकेने खासगी संस्थांना देण्याचे धोरण आखले; अमित साटमांचं वक्तव्य
मकरंद अनासपुरे काय म्हणाले?
पत्रकारांशी संवाद साधताना अनासपुरे यांनी आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामाजिक एकोपा यावर भाष्य केले. ते म्हणाले की, 'पाण्याची तळवळ आम्ही केवळ चालवली नाही, तर त्याचा दशकापूर्ती सोहळाही साजरा केला. यंदा पाऊस जास्त झाला. निसर्गाचा अंदाज कुणालाही बांधता येत नाही. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी, हीच आमची अपेक्षा आहे'.
पुढे, मकरंद अनासपुरे म्हणाले की, 'शासनाने शेतकरी बांधवांसाठी भरीव तरतूद आणणे आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळावा, अशी भूमिका आम्ही गेल्या दशकभरापासून मांडत आलो आहोत. यंदाचा पाऊस त्रासदायक ठरला आहे. उभे पीक बुडाले आहे, खरीप हंगामात हाता-तोंडाशी आलेला घास जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात'.
सोबतच, मकरंद अनासपुरे यांनी समाजातील एकोपा टिकून राहण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले की, 'जर समाज तुटला तर अराजकता माजते. आपण भांवंडांसारखे राहणे गरजेचे आहे. संकटाच्या वेळी आपण एकत्र येतो, हीच खरी ताकद आहे. जर आपण एकत्र पाहिलो तर कुणालाही आपल्याला तोडता येणार नाही. पण जर आपण वेगवेगळी लाकडे झालो, तर आपण सहजपणे तोडले जाऊ. त्यामुळे, गावकी-भावकी, नातेसंबंध, समाजातील एकोपा यांची जपणूक केली पाहिजे'.
राजकीय नेत्यांविषयी विचारले असता मकरंद अनासपुरे म्हणाले की, 'आम्ही कलावंत आहोत. राजकीय लोकांना सल्ले देण्याइतके आम्ही मोठे नाही. त्यांची भूमिका त्यांना विचारावी. माझे मत एवढेच की, आपला समाज एकत्र राहिला तर प्रगती, आनंद आणि परमार्थ साधता येतो. आम्ही कलेची सेवा करतो. त्यामुळे, राजकारणात भाष्य करण्याचे कारण नाही'.